Tuesday, 17 May 2011

चाळीतले प्रेम



मी सकाळी चाळीच्या संडासाबाहेर, तुझि वाट पाहत असायचो.

माझा नंबर आला, तरी दुसर्‍यांना जाऊ द्यायचो.

आई दारातुनच ओरडायची.. "नालायका, हलकटा, बेशरमा,

पाणि तापुन गेलंय येऊन आंघोळ कर ना."

मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचो.

मी सकाळी चाळीच्या संडासाबाहेर, तुझि वाट पाहत असायचो.

तु यायचीस,

पैंजण वाजवत, भरलेली बादली घेऊन.

मॅक्षी सावरत, पारोशी सौंदर्य घेऊन.

तुझे केस विस्कटलेले असायचे.

माझ्या नजरा,

तुझ्या केसांना विंचरत असायचे.

तुझ्या डोळ्यातलं काजळ,

गालावर पसरलेलं असायचं.

मला पाहून, गालातल्या गालात हसायचं.

मी असाच वेडयासारखा तुझ्याकडे चोरून पहायचो.

मी सकाळी चाळीच्या संडासाबाहेर, तुझि वाट पाहत असायचो.

एकदा कळलं, तुझं लग्न ठरलं.

काळीज तुटलं, माझं मन रडलं.

विचारात पडलो, आता काय करायचं?

सरळ जाऊन तुझ्या बाबांना भेटायचं?

तेवढयात मला कुसुमाग्रजांची ती कविता आठवली.

"प्रेम कर भिल्लासारखं, बाणावरती खोचलेलं.

मातीमधे उगवून सुध्दा मेघापर्यंत पोचलेलं"....

... मी ठरवलं, तुला सगळं सांगायचं.

मोरासारखा छाती काढून, तुझ्या समोर ऊभं रहायचं....

.....त्याच रात्री तु माझ्या घरी,

लग्नाची पत्रीका घेऊन आलीस.

मी नजर भिडवताच, तु नजर खाली घातलीस.

माझ्या आईच्या पाया पडुन,...

"लग्नाला सगळ्यांनी यायचं हं", अशी म्हणालिस.

मी नजर भिडवताच, तु नजर खाली घातलीस.

जाताना तुझ्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहत राहिलो.

दुखाच्या सागरात नि‌‍र्माल्यासारखा वाहत राहिलो.

मी असाच वेडयासारखा तुझ्याकडे चोरून पहायचो.

मी सकाळी चाळीच्या संडासाबाहेर, तुझि वाट पाहत असायचो.

------------------ कवीता - जयेश मेस्त्रि---------------------

No comments:

Post a Comment